24 PENS
The 24 Pens page has been launched for true readers and photo-video lovers. Such ones...those who are passionate readers and enthusiast photo-video watchers.
18/01/2023
*आमदारांचे अपघात सत्र*
आमदारांचे अपघात सत्र मागच्या काही दिवसांत एक विचित्र बातमी वर्तमानपत्रात सतत वाचायला भेटत आहे ती म्हणजे,"अमुक नेत्याच्या गाडीला अपघात;तमुक आमदार झाले रस्ते अपघातात जखमी."
१४ ऑगस्ट २०२२ च्या सकाळी शिवसंग्रामचे नेते विनायकराव मेटे यांचे रस्ते अपघातात दुःखद निधन झाल्याची बातमी आली आणि संपूर्ण महाराष्ट्र या बातमीने हादरून स्तब्ध झाला.त्यानंतर माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला पहाटे फलटण येथे झालेला अपघात.त्यांना तातडीने पुण्याला आणून केलेले उपचार हा सारा घटनाक्रम आजही कुणीही विसरले नसेल.
गोरेंच्या अपघाताची चर्चा थांबते न थांबते तोवर दुसरी बातमी आली ती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.धनंजय मुंडे यांच्या गाडीचा बीड येथे झालेला अपघात.त्यात मुंडेंच्या छातीवर लागलेला जबर मार आणि त्यांच्या महागड्या गाडीवरची चर्चा महाराष्ट्रात चांगलीच रंगली होती.
तिसरी बातमी आली ती दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटाजवळ पाठीमागून डंपरने दिलेली धडक आणि त्यामागे असलेल्या घातपाताची शंका.
कदमांच्या बातमीवर उहापोह चालूच होता तोवर अजून एक ब्रेकिंग न्यूज आली ती आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या अपघाताची.
रस्ते असोत वा इतर कोणत्याही प्रकारचे अपघात;अनेक सामान्य माणसं गतप्राण होत असतात.त्यावेळी दोन दिवसांची 'व्यवस्था अपयशा'ची चर्चा रंगते आणि पुन्हा
'मागील पाढे पंचावन्न' अनुभवास येतात.
इथे मात्र महाराष्ट्र राज्याच्या कायदेमंडळाचे सदस्यच जखमी होत असल्याने चर्चेचे गांभीर्य अधिक वलयांकित होते.
बरे तर,कोणत्याही 'माननीयांची' प्रवासी वाहने ही पन्नास लाखाच्या आसपास किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीची असतात तरीही अपघात होतात.एवढ्या किंमतीच्या वाहनांमध्ये सुरक्षेचे बरेच आयाम तपासून वाहन उपलब्ध करून दिले जाते तरीही वेळेअभावी रात्री-अपरात्री प्रवास करण्याचा हट्ट,बेफाम वेग,अनेकदा रस्त्यांची दुर्दशा,
अनावश्यक खड्डे,रस्त्यावर असलेले कमालीचे उतार,
जाहिरातीचे फलक आणि त्यामुळे अपघातास हमखास मिळणारे निमंत्रण आणि पुढील ओढवणारे दुर्दैव ही पारावरची चर्चा आता विधानसभा, संसदेत ऐकायला मिळाली तर नवल नको!
जोवर भारतात प्रत्येक जीव हा 'राष्ट्र उपयुक्त संपत्ती' समजली जात नाही तोवर वरील 'औचित्य प्रश्न' कितीहीवेळा 'शून्य प्रहर' गाजवून गेले तरी 'कायद्याशिवायचे नैतिक मूल्य' कुणाचेही सर्वलक्ष्यी सरंक्षण करू शकणार नाही किंबहुना त्याशिवाय 'आत्मभान येणे नाही.'
-अमोल काळे
15/11/2022
*अन्यथा नष्ट व्हा !*
इजिप्तममध्ये पार पडत असलेल्या कॉप-27(COP)परिषदेत बिघडलेल्या वातावरणासंबंधी,येऊ घातलेल्या संकटांविषयी कालानुरूप मंथन चालू झाले आहे.काही उद्दिष्टे,लक्ष्य ठरविण्यात आली.यापूर्वीही,परिषद अनेकदा भरवली गेली होती.मात्र,'निर्धारित लक्ष्यसिद्धीचे काय ?'...या नव्या प्रश्नाचा जन्म काही काळ आधीच झाला आहे.
आधुनिक जगाची ओळख झाल्यापासून प्रत्येक देश गतीने परंतु वेड्यावाकड्या दिशेने प्रगतीच्या मागे लागला आहे.अशा प्रगतीने दिवसेंदिवस निसर्गाचा ऱ्हास होऊ लागला आहे याकडे लक्ष वेधण्यासाठी COP-27 भरविली जाते.देशोदेशीचे प्रमुख किंवा महत्वाचे मंत्री व त्यांची शिष्टमंडळे परिषदेस हजर राहतात.परिषदेत नवनवी प्रतिपादने,भाषणे करतात. काहींच्या भाषणात जबाबदारीचे भान तर काहींच्या भाषणात टीकेचा सूर आळवला जातो."आमचे कार्बन,हरित गृह वायू उत्सर्जन त्यांच्या पेक्षा खूप कमी आहे." अशी तुलना केली जाते आणि मूळ उत्तरदायित्वाचा विसर पडतो.
औद्योगिकीकरणामुळे आजवर निसर्गाचे लचके तोडले जात होते आता मात्र त्याचा गळाच दाबायचा प्रयत्न सुरू झाले आहेत.अशाने नवं भरारी घेणाचे आकाश जीवघेणे दूषित तर भरारी घेऊन पुन्हा परतण्यासाठी लागणारी जमीन आक्रसत चालली आहे.त्यातूनच वारंवार येणारे महाभयंकर पूर,उपासमारीचे न थांबणारे सत्र सुरू झाले आहे.
संयुक्त राष्ट्रांनी 1992मध्ये पहिली परिषद आयोजित केली.
1994 पासून हवामान बदलावरील उपायांची अंमलबजावणी चालू केली.तेव्हापासून दरवर्षी परिषद भरवली जात आहे. यावर्षीच्या परिषदेला आरंभापासून कार्बन उत्सर्जनावरील उपायांची न होणारी अंमलबजावणी यावर खूप चर्चा झाली.त्यात हवामान बदल रोखण्यासाठी गंभीरपणे अंमलबजावणी करायची असा निर्धार यजमान देशाने केला आहे.परिषदेच्या उर्वरित काळात बाकीचेही बरेच मुद्दे बाहेर येतील.इतर देश त्यास साथ देऊन 'वसुंधरा वाचवण्यास' कटिबद्ध राहतील असा आशावाद बाळगायला हरकत नाही.
बदलत्या तंत्रज्ञानासोबत पर्यावरणस्नेही तंत्रकुशलता वा प्रगती साधली जाऊ शकते.असे प्रचंड क्षमताशाली मानवी मेंदुच्या आविष्काराने वेळोवेळी सिद्ध केले आहे.
असे केल्यानेच शाश्वत विकास साधला जाऊ शकतो.
भारतासारख्या काही देशांची अवस्था तर आता कुठे प्रगतीला खऱ्या अर्थाने सुरुवात व्हायला आणि परिषदेत बंधने,नवनिर्धार यांच्यावर उहापोह व्हायला एकच गाठ पडली आहे.असे असले तरी,पर्यावरणाचे संतुलन राखूनच पुढे जायला हवे.
"अन्यथा नष्ट व्हा !",हे अँटोनियो गुटेरिस यांचे यंदाच्या परिषदेतील शब्द येत्या काही दिवसांत दृष्टिपथात आल्याशिवाय राहणार नाही.
-अमोल काळे
Click here to claim your Sponsored Listing.
Contact the business
Telephone
Website
Address
Pune